Book's review - पुस्तकांची ओळख

मनाला उभारी देणा‍र्‍या कविता

जीवन हे सुंदर आहे आणि तेवढ्याच सुंदरतेने आपण ते जगायचे असते. अर्थात आपणही ते जीवन समरसतेने जगत असतोच.पण कधी कधी ध्यानी मनी नसताना समोर अडचणीचा डोंगर उभा राहतो आणि आपल्याला संकटांना सामोरी जावे लागतं. त्या संकटांवर आपण कधी मात करतॊ तर कधी शरण जातो. अशा नैराश्याच्या क्षणी आपल्याला गरज असते ती प्रसंगाला धाडसाने सामोरी जाण्याची,जगण्याला पुन्हा साद घालण्याची,बहरण्याची...नव्हे,पुन्हा नव्याने बहरण्याची. आणि अशी मदत आपल्याला मिळू शकते ती कधी माणसाकडून तर कधी कथा-कवितांमधून.
   "बरच काही सरुनही,थोडं फार उरायचं
     दु:ख हे असं की,ते आयुष्यभर पुरायचं.......
    खरे-खोटे,डावे-उजवे,भेटती जरी नवे-जुने
    तरी निष्कपटपणे त्यांच्यातही,नव्यानं बहरायचं"
 अशी एखादी कविता जर आपल्य़ा वाचनात आली तरी आपण जगण्यास आनंदाने सामोरी जातो, ही स्फूर्तीदायी कविता आहे कवी एकनाथ आव्हाड यांची!
कवी एकनाथ आव्हाड यांनी आपल्या "नव्याने बहरावे" हा पहिला काव्यसंग्रह घेवून साहित्य क्षेत्रात एक दमदार पाऊल टाकले आहे. आणि अशा जगण्याच्या ओघात प्रेरणादायी वाटणार्‍या एकूण ५७ स्वरचीत कवितांचा समावेश ह्या काव्यसंग्रहात केला गेला आहे.
पेशाने शिक्षक असलेले कवी एकनाथ आव्हाड हे एक प्रथितयश बालसाहित्यिक आहेत. "बोधाई,गंमत गाणी,अक्षरांची फुले,ह्सरे घर,राजा झाला जंगलाचा आणि निष्फळ भांडण" अशी त्यांच्या  बाल काव्य-कथांच्या संग्रहांची नावे आहेत. महाराष्ट्र शासनाचा कवी मायदेव हा राज्य पुरस्कार, मसाप पुणे,बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर,साहित्य दरवळ मंच मुंबई, कै.शशिकला आगाशे पुरस्कार बुलढाणा असे उत्कृष्ट बालवाङ्मयाचे अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.
 कवी एकनाथ आव्हाड हे शिक्षक असल्याकारणे त्यांना बालमनाची उत्तम समज आहे,जाण आहे. "प्रार्थनेचा आधार" या त्यांच्या कवितेत ते म्हणतात,"निरागस बालकांत म्हणे,प्रभूचेच रुप असे,
        तरी त्यांना धाकात,जग ठेवताना दिसे
            ---------------------------------------
        हिच माझी प्रार्थना,त्या उगवत्या सूर्याला,
         अंधारातून प्रकाशाकडे,ने या चिमुकल्याला"
बालमनासाठी असं पसायदान मागणारे,आपल्या विद्यार्थ्यांना समजावून घेणारे शिक्षक दुर्मिळच. वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनीच्या अडीअडचणीचा पाठपुरावा करुन कवी एकनाथ आव्हाड तिला नियमित शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करतात. अशा अर्थाची सत्य घटनेवर आधारित त्यांची ’सतत गैरहजर’ ही कविता आहे. जी प्रत्येकाने वाचायलाच हवी.  असे कर्तव्यनिष्ठ एकनाथ आव्हाड सर मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षकांना मिळणारा महापौर पुरस्काराचेही ते मानकरी आहेत.
अर्थात त्याची कविता फक्त बालमनाचे विश्लेषण करीत नाही तर त्यात प्रेम कविता,व्यक्ति विशेषपर,निसर्ग वर्णन, आशादायी अशा वयाच्या वेगवेगळ्या वळणावर भेटणार्‍या कविताही पुस्तकात पानोपानी आपली सोबत करतात.
कवी आव्हाड यांची "त्यापेक्षा" ही कविता तर आम्ही दान करतो या वृत्ती-प्रवृत्तीला एक सणसणीत उत्तर आहे. हे एका क्षणाचं दान तस पाहिल तर त्या दान घेणार्‍या माणसाला किती हतबल करतं,किती अपंग करत जातं हे सांगून असं दान करण्यापेक्षा दान मागणार्‍या त्याच्या हाताला दान घेण्याऎवजी काम करण्याची सवय लावणं आज किती गरजेच आहे असा सार्थ विचारही वाचकांना कवी आव्हाड यांच्या कवितेतून मिळून जातो.
वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वदूर गेलेली कवी आव्हाड यांची "पाऊस आणि ती" ही कविता वाचकांना अतिशय अतंर्मुख करणारी असून एका विधवेची व्यथा त्यांनी आपल्या कवितेतून अतिशय बोलकी केली आहे.
सहसा वडिलांवर कविता लिहिणारे कवी कमीच पण "माझा बा" ही कवी आव्हाडांची वडिलांवरची कविताही त्याच्या वेगळॆपणाची साक्ष देते
     "बाचं बोलणं उगवणारं,जणू अनुभवाचं पीक
      जीवनाचा प्रत्येक धडा,म्हणतं पोरा नेकीनं शिकं"
इतके सुंदर विचार,संस्कार कवी आव्हाडांनी आपल्या कवितेतून वाचकांपर्यंत पोहचवले आहेत.साहित्यात दुर्लक्षित रहिलेला बापाला त्यांनी आपल्या शब्दांने न्याय दिला आहे
."नव्याने बहरावे" या काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेत बाल विकास मासिकाचे संपादक मा.यशवंत क्षीरसागर म्हणतात,"खरी कविता जशी कवीला आनंद देते, तद्वत समाजातही आनंदाची,मांगल्याची पखरण करु शकते कवी आव्हाडांच्या कवितांमधून आढळणारी सात्विकता निश्चितच स्पृहनीय व अनुकरणीय अशी वाटते." तर सा.पोलीस आयुक्त,कवी धनराज वंजारी कवी आव्हाड यांच्या कवितेबद्दल बोलताना म्हणतात," या कवितेच्या शब्दा-शब्दात मानवी भावभावनांची स्पंदनं प्रत्ययास येतात आणि शब्दांच्या सामायिक गुंफणीतून अर्थांचे मंजूळ स्वर मनात पिंगा घालतात"
कवी आव्हाड यांच्या कवितांना मुळातच एक ताल,लय आहे. त्य़ांच्या कवितेला चाली लावून त्यांची गाणीही झालेली आहेत. त्यांनी कवितेची मांडणी वेगळी करण्याचाही प्रयत्न केला आहे,आणि तो मनाला भावून जाणारा असाच आहे.
आपल्या "रात्र" ह्या कवितेतही त्यांनी एक वेगळा विचार आपल्याला दिला आहे.
     "दाट काळोखात,रात्र कण्हत होती,
      हा भास होता की, ती काही म्हणत होती,
      अशी ही रात्र, मलाही जवळून पाहत होती,
       पाहता पाहता डोळ्यात माझ्या,स्वप्नं उद्याचं पेरीत होती"
तर अशा विविध विषयांवर,मनाला उभारी देणार्‍या साध्या-सोप्या पण तेवढ्याच आशयघन कवितांचा हा काव्यसंग्रह कवीश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांच्या कवितेची वाचकांना नक्कीच आठवण करुन देणारा आहे, आणि वाचकांनी संग्रही ठेवावा असाच आहे
-------------------------------------------------------------
ज्योति कपिले
--------------------------------------------------------------
कवी एकनाथ आव्हाड
9820777968
काव्यसंग्रह-"नव्याने बहरावे"
प्रकाशक-शुभाय प्रकाशन
किंमत- ६० रुपये पृष्ठे - ७२.